मुख्य सामग्रीवर वगळा

Science Aptitude Test

पृथ्वी सपाट की गोल?

आपली पृथ्वी सपाट आहे की गोल या प्रश्नाचे उत्तर आज आपण अगदी सहजपणे देऊ शकतो कारण आपण अंतराळातून पृथ्वीचे काढलेले फोटो आज आपल्याकडे आहे, पण पूर्वीच्या काळी हे एवढं सोपं नक्कीच नव्हतं. त्यांच्याकडे कोणतीही आधुनिक साधनं किंवा साहित्य नव्हतं तरी पण त्यांची निरीक्षणं आणि वैज्ञानिक प्रयोग करण्याचं कसब मात्र उत्तम होतं.

चला तर मग कसं त्यांनी या प्रश्नाचं उत्तर मिळवलं ते जाणून घेऊया आजच्या गोष्टीतून

पृथ्वीचा आकार गोल आहे हे लक्षात येण्यासाठी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून कमीत कमी 35000 फूट उंचीवरून निरीक्षण करणे आवश्यक आहे किंवा समुद्रप्रवासाने गोलाकार पृथ्वीला प्रदक्षिणा घालून परत त्याठिकाणी येणे आवश्यक आहे. प्राचीन काळी एवढ्या उंचीवर पोहचण्याचे अज्ञात तंत्रज्ञान आणि समुद्र प्रवासाची भीती यामुळे आपल्या सभोवतालीचे जग हे सपाट आणि स्थिर असल्याचा समज निर्माण झाला. सूर्य आणि चंद्राचे पृथ्वीभोवती फिरतांना दिसणे यामुळे हा समज आणखी दृढ होत गेला.

प्राचीन ग्रीक लोकांना मात्र पृथ्वी गोलाकार आहे याबद्दल कुठलीही शंका नव्हती याचे कारण त्यांनी केलेली निरीक्षणे, त्यांना असलेलं विज्ञान आणि गणिताचं ज्ञान हे होतं. त्यांची निरीक्षणं कोणती तर समुद्रातील जहाजाच्या डेकवरून किंवा जमिनीवरील उंच ठिकाणावरून बघितले तर दूरचे क्षितिज नेहमी आणि सर्वत्र गोलाकार असते. हे क्षितिज वाढत्या उंचीसह रुंद होत जाते आणि असे केवळ गोलाकार पृष्ठभागावरच होऊ शकते.

समुद्रातून येणारे जहाज जेव्हा पहिल्यांदा दूरच्या क्षितिजावर दिसते तेव्हा त्याचा वरचा भाग सर्वात आधी दिसतो नंतर जसे जसे ते जहाज जवळ येते तसा खालचा भाग दिसायला लागतो, जर पृथ्वी सपाट असती तर संपूर्ण जहाज एकाच वेळी दिसायला सुरुवात झाली असती.

सूर्य वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळी उगवतो आणि मावळतो यावरून सुद्धा हेच स्पष्ट होते की पृथ्वी गोलाकार आहे.






प्राचीन काळी इजिप्तमधील अलेक्झाँड्रिया शहरात इरॅटोस्थेनिस नावाचा एक माणूस राहत असे. तो खगोलशास्त्रज्ञ, इतिहासकार, भूगोलतज्ञ, तत्वज्ञ, कवी, नाट्यसमीक्षक आणि गणिती होता. तो अलेक्झाँड्रियाच्या प्रचंड ग्रंथालयाचा संचालक होता. दक्षिणेकडील सीमारेषेवरच्या सिएनी इथे, नाईलनदीवरील पहिल्या धबधब्याजवळ, २१ जून रोजी दुपारी १२ वाजता उभ्या असलेल्या काठ्यांची सावली पडत नाही. उन्हाळ्यातील अयनदिनी, म्हणजे त्या वर्षातील सर्वात मोठ्या दिवशी, जेव्हा दिवस मध्यान्हीकडे सरकू लागला, तेव्हा मंदिराच्या खांबांच्या सावल्या लहान झाल्या. १२ वाजता तर त्या गायब झाल्या सूर्याचं प्रतिबिंब तेव्हा एका खोल विहिरीतल्या पाण्यामध्ये पाहणं शक्‍य होतं. सूर्य अगदी बरोबर डोक्यावर होता.

या निरीक्षणाकडे इतर कुणीही सहजी दुर्लक्ष केलं असतं. पण इरॅटोस्थेनिस शास्त्रज्ञ होता. त्याने प्रयोग करायचं ठरवलं. त्याने अलेक्झँड्रियामध्येही 21 जून रोजी उभ्या काठ्यांचा सावल्यांचं काय होतं याचं निरीक्षण करायचं ठरवलं आणि सावल्या पडल्या.

जर पृथ्वी सपाट असेल तर एकाच वेळी, सर्व ठिकाणी एकाच उंचीच्या काठ्यांची सावली सारखीच पडायला पाहिजे किंवा जर सूर्य माथ्यावर असेल तर पडायलाच नको. यावरून हे सिद्ध झाले की पृथ्वी गोलाकार आहे. एवढ्यावरच न थांबता याच प्रयोगाच्या सहाय्याने इरॅटोस्थेनिसने पृथ्वीचा परीघ शोधून काढला. तो पृथ्वीचा आकार मोजणारा पहिला मानव ठरला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अपसूर्य स्थिती- व्हायरल मॅसेज आणि सत्य

सध्या सोशल मिडीयावर एक मॅसेज फिरत आहे ज्यामध्ये 23 जूनपासून 22 ऑगस्ट पर्यंत सूर्य पृथ्वीपासून सर्वात दूर असेल (अपहेलीऑन) आणि त्यामुळे खूप थंडी पडेल, लोकं आजारी पडू शकतात, तुमची प्रतिकारशक्ती वाढवा वैगरे वैगरे पण या मॅसेजमध्ये बऱ्याच गोष्टी चुकीच्या सांगितल्या आहे आणि त्या कशा व सत्य परिस्थिती काय आहे ते तपासून बघितले पाहिजे. अपसूर्य स्थिती (अपहेलीऑन) म्हणजे काय? पृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत असल्याने वर्षातील काही वेळा पृथ्वी सूर्याच्या जवळ तर काही वेळा सूर्यापासून लांब असते. साधारणपणे 3 जानेवारी या दिवशी सूर्य आणि पृथ्वी सर्वात जवळ असतात त्यावेळी त्यांच्यातील अंतर 14 कोटी 70 लाख किलोमीटर एवढे असते त्याला उपसूर्य स्थिती (पेरीहेलीऑन) असे म्हणतात तर साधारणपणे 4 जुलै या दिवशी सूर्य आणि पृथ्वी सर्वात दूर असतात त्यावेळी त्यांच्यातील अंतर 15 कोटी 20 लाख किलोमीटर एवढे असते त्याला अपसूर्य स्थिती (अपहेलीऑन) असे म्हणतात आणि हे दरवर्षी होणारी घटना आहे त्यामुळे यावर्षीच हे होत आहे किंवा यात काही विशेष आहे असे नाही. मॅसेजमधील चुकीच्या गोष्टी: पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर 5 प्रकाशमिन...

मिलेटसचा थेल्स

इसवी सनाच्या पाचव्या सहाव्या शतकात एका वर्षी ग्रीसमधील अथेन्स शहराच्या सुमारे तीनशे किलोमीटर अंतरावरील मिलेटस या शहरात एक अजब घटना घडली होती. त्या वर्षी जोरदार पाऊस झाल्याने खूप मोठ्या प्रमाणावर ऑलिव्हचे उत्पादन  झाले होते. या फळांपासून तेल निघत असल्याने व ते घरगुती वापरात येत असल्याने त्या प्रदेशात तेलघाणींचा  व्यवसाय प्रचलित होता. या वर्षी शेतकरी खूप आनंदात होते, खूप वर्षांनंतर एवढे पीक आले आणि आता फक्त तेल काढून ते बाजारात न्यायचे होते. तेल काढण्यासाठी जेव्हा ते आपले आपले उत्पादन घेऊन घाणींच्या मालकांकडे गेले तेव्हा हताशपणे सर्व मालकांनी त्यांना थेल्सकडे जायला सांगितले. थेल्स हा मिलेटस शहरातील स्वतःच्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग करून घेणारा प्रसिद्ध व्यक्ती होता. हिवाळ्यातच आपल्या निसर्ग निरीक्षणाने या वर्षीच्या पर्जन्याचा कयास त्याने बांधला आणि मिलेटस शहरातील सर्व तेलघाणी त्याने खूप कमी किमतीत भाडेतत्वावर विकत घेतल्या. आता मालकांना घाणींच्या वापरासाठी तो म्हणेल त्या किमतीला त्या परत घ्याव्या लागणार होत्या आणि यातून थेल्सला बराच पैसा मिळणार होता.   (या थेल्सबद्...

विज्ञान रंजन स्पर्धा 2023 (प्रश्नावली)