28 फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. 1986 साली राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान दळणवळण परिषदेच्या सुचनेवरून भारत सरकारने सर सी. व्ही. रामन यांच्या संशोधन प्रकल्प सादरीकरणाच्या सन्मानार्थ हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले. 1987 साली परिषदेतर्फे विज्ञान संवाद व विज्ञान प्रसारासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय विज्ञान प्रसार पुरस्कार जाहीर केले. तेव्हापासून दरवर्षी समाजामध्ये दैनंदिन जीवनातील विज्ञानाचे महत्त्व रूजणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार होणे, मानवी कल्याणासाठी विज्ञान क्षेत्रात घडणाऱ्या घडामोडी, वैज्ञानिकांचे प्रयत्न, धडपड व त्यांचे शोध यांच्या प्रदर्शनासाठी तसेच विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील नवं तंत्रज्ञान व नवीन आव्हाने यांची चर्चा करण्यासाठी, विज्ञानाधिष्ठित समाजनिर्मिती आणि त्याचबरोबर विज्ञान प्रसार व प्रचारासाठी विज्ञान दिन साजरा केला जातो.
दरवर्षी एखाद्या विशिष्ट विषयाला धरून सार्वजनिक व्याख्याने, रेडिओ, टीव्हीवर विविध कार्यक्रम, विज्ञान विषयक चित्रपट, विज्ञान प्रदर्शनं, वाद विवाद स्पर्धा, प्रश्नमंजुषा स्पर्धा, प्रकल्प स्पर्धा अशा अनेक माध्यमांतून विज्ञान दिन साजरा केला जातो. 2020 साली या दिवसाचा विषय होता 'विज्ञान क्षेत्रातील महिला'. युनेस्कोच्या सांख्यिकी संस्थेनुसार जगातील संशोधकांमध्ये महिलांची संख्या तीस टक्क्यांपेक्षाही कमी आहे, भारतात हा आकडा 14 टक्क्यांपेक्षाही कमी येतो. 1901 सालापासून प्रदान 923 नोबेल पारितोषिक विजेत्यांपैकी महिला फक्त 48 आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा