पुर्वीच्या काळी रसायनशास्त्र हे मुळातच खालच्या दर्जाचं मानलं जात असे याचं कारण म्हणजे बरीच लोकं कुठल्यातरी पदार्थांवर काहीतरी प्रक्रिया करून परिस, सोनं किंवा अमृत बनवता येईल यांसारख्या अशक्य आणि बावळट गोष्टीच्या मागे लागले होते. या जंजाळातून रसायनशास्त्राला आधार देत बाहेर काढण्याचं महत्त्वपूर्ण काम रॉबर्ट बॉईल यांनी केलं.
1657 साली हवा आणि निर्वात पोकळीचा अभ्यास करत असतांनाच 1643 साली टॉर्सेलीने निर्वात पोकळीचा स्त्रोत शोधण्यासाठी केलेल्या प्रयोगाकडे त्यांचं लक्ष गेलं.
टॉर्सेलीच्या प्रयोगात वायुदाबमापकाचा शोध लागला होता. पुर्णपणे पाऱ्याने भरलेली काचेची नळी पारा असलेल्या पात्रात उलटी ठेवली असता त्या नळीतील पाऱ्याची पातळी कमी होत पात्रातील पाऱ्याच्या पातळीपासून 760 मि. मी. अंतरावर स्थिर होत होती. यावरून हवेचा दाब 760 मि. मी. पाऱ्याच्या पातळी एवढा असुन तोच नळीत निर्वात पोकळी निर्माण होण्यास कारणीभूत आहे हे दिसून येत होते.
याच काळात आणखी एका शोधाकडे त्यांचे लक्ष वेधले गेले तो म्हणजे 1654 साली अॉटो व्हॉन ग्युरिक यांनी शोधलेला निर्वात पंप. या पंपाबाबत रॉबर्ट हूक यांच्याशी चर्चा करून हूक यांच्या सुधारीत पंपाच्या सहाय्याने हवेचा दाब व निर्वात पोकळी यांचे अनेक गुणधर्म त्यांनी अभ्यासले आणि याचं फलित म्हणजे वायुंच्या नियमांपैकी शोधला गेलेला पहिला नियम, बॉईलचा नियम.
'वायूचा दाब आणि आकारमान हे एकमेकांच्या व्यस्त प्रमाणात बदलतात' म्हणजे वायूवरचा दाब वाढवला की त्याचं आकारमान कमी होतं व याच्या उलट सुध्दा म्हणजे वायूवरचा दब कमी केला की त्याचं आकारमान वाढतं.
यासाठी त्यांनी U आकाराची नळी घेऊन त्यातील विशिष्ट वजनाच्या वायूवर वेगवेगळ्या आकारमानाच्या पाऱ्याने वेगवेगळा दाब दिला म्हणजे या नळीच्या डावीकडील तोंड पुर्णपणे बंद असून उजवीकडून पारा ओतला असता विशिष्ट वजनाचा वायू डावीकडील नळीच्या आत अडकेल व त्याचे काही आकारमान असेल, जसं जसं आणखी पारा ओतला जाईल म्हणजे त्या वायूवरील दाब वाढवला जाईल तसं तसं डावीकडील नळीच्या आतील पाऱ्याची पातळी वाढेल व अडकलेल्या वायूचे आकारमान कमी होत जाईल.
हा वायूंच्या नियमांपैकी शोधला गेलेला पहिला नियम होता. अशाप्रकारच्या दुसऱ्या नियमाच्या शोधासाठी शंभर वर्षे जावी लागली.
छान. चांगला उपक्रम होईल
उत्तर द्याहटवा